राज्यातील 59 लाख विद्यार्थी विना ‘आधार’

0

पुणे । राज्यातील 59 लाख 64 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्याप काढण्यात आले नसल्याचे उघडकीस आले आहे. पुढील महिन्याभरात या विद्यार्थ्यांचे आधार काढले नाही तर शिक्षकांचे दिवाळीतील पगार रोखणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. पहिली ते बारावीमधील 2 कोटी 24 लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ 75 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचे आधार लिंक झाले आहे. तर 88 लाख 76 हजार विद्यार्थ्यांचे आधार तपासून घेणे बाकी असून 59 लाख 64 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्याप काढलेच नसल्याची आकडेवारी शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने 14 ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढत राज्याच्या विद्यार्थी, शिक्षक, शाळा, संस्था यांच्यासाठी असणार्‍या सरल या संगणक प्रणालीमध्ये माहिती अपलोड करण्यास सांगितले आहे.

30 सप्टेंबरपर्यंत मुदत
शिक्षण विभागाने संस्थानोंदणीसाठी 31 ऑगस्ट, स्टाफ पोर्टल भरण्यासाठी 15 सप्टेंबर तर संच मान्यता आणि पर्यायाने विद्यार्थ्यांचे आधार लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे. या मुदतीत जर शिक्षकांनी ही माहिती भरली नाही तर त्यांचा दिवाळीचा पगार रोखण्यात येईल, असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.

शाळेची माहिती बंधनकारक
सरल प्रणालीमध्ये शिक्षकांना राज्यातील विद्यार्थ्यांचे नाव, जात, जन्मतारीख, पत्ता या गोष्टींपासून आधार, शिक्षक मान्यता, शाळा नोंदणी या सगळ्याची माहिती भरण्यास सांगितले आहे. शिक्षण विभागाचा सरलमध्ये माहिती भरण्याचा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. मात्र अद्यापही राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची, शिक्षकांची, संस्थांची आणि शाळांची माहिती सरलवर आलेली नाही.