मुंबई । राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश धरणे पूर्ण भरली असून, त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरणांमधून पाणी सोडले जात असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणेदेखील पूर्णपणे भरली आहेत.
जायकवाडी 92 टक्के भरले
कोयना, भंडारदरा, उजनी, जायकवाडी या धरण क्षेत्रांमध्येही वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. जायकवाडी धरण सध्या क्षमतेच्या 92 टक्के भरले आहे. उजनी धरण पूर्णपणे भरले आहेत.
मोडक सागर, तानसा, भातसा ओव्हरफ्लो
मोडक सागर धरण पूर्णपणे भरले असून, त्यामध्ये सध्या 128.93 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. मोडक सागर तलाव क्षेत्रात दिवसभरात 135 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तानसा धरणदेखील जवळपास पूर्णपणे भरले आहे. सध्या तानसा धरणात 144.59 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. तानसा धरणाची एकूण क्षमता 145.08 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. भातसा धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. एकूण 942.10 दशलक्ष घनमीटर इतकी क्षमता असलेल्या या धरणात सध्या 98.69 टक्के म्हणजेच 929.77 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे.
वसई, विरारची चिंता मिटली
मुसळधार पावसाने मुंबईला येणार्या ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील लाखो लोकांची दैना केली आहे. मात्र याच पावसाने धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावून या भागातील लोकांना मोठा दिलासाही दिला आहे. ठाणे आणि कल्याणला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण पूर्ण भरले आहे. या धरणाची क्षमता 233.07 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. दमदार पावसाने मुंबई लगतच्या वसई, विरार, मिरारोड आणि भाईंदरचीही चिंता मिटली आहे. या महापालिकांसाठी महत्त्वाचे असलेले धामणी धरणदेखील 100 टक्के भरले आहे.