राज्यात वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा

0

पुणे । राज्यात आज वादळी वार्‍यासह पूर्व मोसमी पाऊस पाडणार आहे. मराठवाडा, उत्तर, मध्य आणि पश्‍चिम महाराष्ट्रात वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने दिला आहे. मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर, मध्य महाराष्ट्रात अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात रविवारीही काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
हवामान विभागाने रविवारीही तुरळक पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे काही भागात पावसाने हजेरी लावली होती. आता 15 ते 16 मेरोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. 17 व 18 मेरोजी कोकण-गोवा, मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या 24 तास कोकण-गोवा व मध्य-महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे होते. कोकण-गोवा, मध्य-महाराष्ट्र व विदर्भात काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते.

यंदा पाऊसमान सामान्य
भारतीय हवामान विभागाने पाऊस सामान्य राहील, अशी शक्यता व्यक्त केली होती. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: 42 टक्के असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. तर पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 12 टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमानाचा पारा 47 अंशांवर पोहोचला आहे. विदर्भातील चंद्रपुरात 47 डिग्री तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक पावसाची वाट पाहत आहेत.

मान्सूनचे यंदा लवकर आगमन
मान्सून 20 मेरोजी अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचेल. यानंतर तो 24 मेरोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरावरुन मान्सूनचा प्रवास सुरू होईल, असा स्कायमेटचा अंदाज आहे. मान्सून 28 मेरोजी केरळमध्ये दाखल होईल. मान्सून अपेक्षेपेक्षा चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल होईल, असा स्काटमेटचा अंदाज आहे. केरळमध्ये मान्सून साधारणत: एक जूनला दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस आधीच केरळमध्ये पोहोचणार आहे. यंदाचा मान्सून 100 टक्के सामान्य राहणार असल्याचा अंदाज 4 एप्रिल रोजी स्कायमेटने व्यक्त केला होता.

तापमानात वाढ
गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमखु शहरामंध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई (कुलाबा) 34.0 सांताक्रुझ 34.6, अलिबाग 35.0, रत्नागिरी 34.4, पणजी (गोवा) 34.1, डहाणू 35.0, पुणे 39.4, जळगाव 43.2, कोल्हापूर 36.1, महाबळेश्‍वर 33.0, मालेगाव 42.2, नाशिक 39.2, सांगली 36.4, सातारा 39.2, सोलापूर 41.1, उस्मानाबाद 40.4, औरिंगाबाद 40.6, परभणी 43.6, नांदेड 41.5, अकोला 43.7, अमरावती 43.4, बुलढाणा 40.6, ब्रह्मपुरी 43.5, चंद्रपूर 43.4, गोंदिया 43.2 नागपूर 42.9, वर्धा 43.5, यवतमाळ 42.5 असे होते. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे 43.7 अं. से. नोंदवले गेले.