मुंबई: मुंबईत मनसेने आयोजित केलेल्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो व त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नसल्याचे सांगितले होते. यावर इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरे हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहे. मात्र त्यांच्या कानाला आताच का होत आहे? असा प्रश्न एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्याने शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा घेण्याचा मनसे प्रयत्न करत आहे. परंतु लोकं हुशार झाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे विचार करुन बोलले तर चांगल होईल असा इशारा देखील इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना दिला आहे. देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले होते.
दरम्यान, अधिवेशनात पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वजाचं अनावरण केलं. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात ‘मराठी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी न करता ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो’ अशी साद घालू केली. त्यामुळे मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या अधिवेशनात स्पष्ट झाले आहे.