गृहराज्यमंत्री केसरकर यांचा भाजपला सल्ला
जालना : जो फटका द्यायचा असतो तो जनतेने द्यायचा असतो. तो फटका दोन-तीन वेळा मिळूनही राणे सुधारलेले नाहीत. आपण महाराष्ट्राला काय देऊ शकतो, त्यापेक्षा मला काय मिळणार होते आणि ते मला न मिळाल्यास मी काय करु शकतो, हे नारायण राणे यांनी दाखवून दिले आहे. ही पैशाची गुर्मी असून ती गुर्मी महाराष्ट्रातील जनताच उतरवू शकते. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि भ्रष्ट माणसाला भाजपने प्रवेश देऊ नये, असा सल्ला शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपला दिला. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते. अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करताना नारायण राणे हे पूर्वी शिवसेनेतच होते हे मात्र केसरकर विसरल्याचे दिसून आले.
तर अपप्रवृत्तींना राजमान्यता
केसरकर म्हणाले, गुन्हेगारीकरण रोखणे ही जशी शिवसेनेची जबाबदारी आहे, तशी भाजपची आहे. कारण भाजपची केंद्रात सत्ता असल्यामुळे भाजप आमचा मोठा भाऊ आहे. राज्यात अधिक आमदार त्यांचे आहेत. त्यांना गरज आहे का अपप्रवृतीच्या माणसांना पक्षात घ्यायची. राणेंना पक्षात घेतल्यास अपप्रवृत्तींना राजमान्यता मिळेल. याचा परिणाम केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारतावर होईल, असे मतही दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. राणे टीव्हीवर सांगतात की, आम्ही एवढे आमदार फोडणार, कशाच्या जोरावर? पैशाच्या? मग लोकशाहीला काय अर्थ राहिला. असा सवाल उपस्थित करत केसरकर म्हणाले, राणे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्न येतो, तेव्हा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात ते लक्षात घ्यायला हवे. मोदी यांचे भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स धोरण आहे. महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट व्यक्ती म्हणून कोणावर आरोप आहेत. प्राप्तिकर खात्यात असलेला एक शिपाई आज अंबानींच्या खालोखाल बंगला बांधतो. महाराष्ट्रातील जनतेला हे गुन्हेगारीकरण दिसत नाही का?
ही संस्कृती रुजता कामा नये
त्यांच्या मुलाची गाडी ओव्हरटेक करणार्या सिनिअर सिटीझनला मारहाण केली जाते. मोठ्यात मोठ्या माणसाच्या अंगावर हात उचलला जातो. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा अरेतुरे उल्लेख केला जातो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? जी संस्कृती आम्ही कोकणातून हद्दपार केली, ती महाराष्ट्रात फोफावता कामा नये, रुजता कामा नये, असेही केसरकर म्हणाले.