नवी दिल्ली : अयोध्या येथील भव्य अशा राममंदिर बांधकामाला पुढील सहा महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी दिली. येत्या दोन, तीन वर्षात मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात आयोजित अयोध्या पर्वाच्या उद्घाटन कार्यक्रमात नृत्य गोपाल दास बोलत होते. अयोध्येत भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. त्याच्या नकाशाला व्यापक आकार देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबले म्हणाले की, दिल्लीचा स्वभाव कायमच वादग्रस्त राहिला आहे. नेहमी अयोध्येला दाबण्यात आले आहे. त्यामुळे देश जसा असायला हवा होता, तसा नाही. आता मात्र प्रतीक्षा संपली आहे. दिल्लीत अयोध्या आणण्याचा प्रयत्न सुरू असून ज्या दिवशी दिल्लीवर अयोध्येचे वर्चस्व राहिल त्या दिवशी भारताचा पुनरोदय होईल, असंही होसबले यांनी सांगितले.
प्रभू रामचंद्र केवळ आराध्य दैवत नाही. ते भारताची आत्मा आहे. संस्कृतीची ओळख आणि अस्मिता आहे. यावेळी होसबले यांनी राममनोहर लोहिया यांच्याद्वारे चित्रकूट येथे आयोजित करण्यात आलेल्या रामायण यात्रेचा देखील उल्लेख केला.