रायगडमधील तळई गावात दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू , ४० बेपत्ता

रायगड : रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून याखाली ३२ घरे दबली गेली होती. सकाळी या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. यात आतापर्यंत ३२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे, तर आणखी ४० जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणावर मोठे संकट आले आहे. एकीकडे चिपळून महाडसारखी शहरे पुराच्या विळख्यात सापडली असताना कोकणातील डोंगर कपारीत वसलेल्या अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी चारच्या रायगडमधील तळई गावात दरड कोसळली. या दरडीच्या ढिगाऱ्याखाली गावातील सुमारे ३५ घरे गाडली जाऊन मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे या दुर्घटनास्थळावर मदत पोहोचवणे शक्य झाले नाही. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनीच मदतकार्य सुरू करून येथील गाडल्या गेलेल्या घरांमधून तब्बल ३२ मृतदेह बाहेर काढले आहेत. तर अद्यापही ८० ते ९० मृतदेह ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जखमींनी हेलीकाॅप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात येत आहे. महाड सावित्री पुरातील नागरिकांना एका हेलीकाॅप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात येते आहे. प्रशासनाला आणखी तीन हेलीकाॅप्टरची आवश्यकता आहे.

खेडमध्ये दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या धामणंदनजीकच्या पोसरे बौद्धवाडीत शुक्रवारी दरड कोसळून १७ जण त्याखाली गाडले गेले आहेत. गेला आठवडाभर संततधार पाऊस पडत आहे. त्यात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक झाला आहे. या मुसळधार पावसामुळे पोसरे येथील बौद्धवाडीवर दरड कोसळली. १२ घरांना त्याचा फटका बसला. त्यातील ६ घरे पूर्णपणे गाडली गेली आहेत. त्यात १७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. २५ झानावरेही दरडीखाली गाडली गेली आहेत. प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तेथे संपर्क होत नसल्याने यंत्रणाही हतबल झाली आहे.