ठेवीदार संतप्त ; धनादेश न मिळेपर्यंत अटकेत राहण्याचा पवित्रा
रावेर- सतत 12 वर्षांपासून पतसंस्थेत ठेवींच्या परताव्यासाठी पाठपुरावा करून सुद्धा सहकार खाते ठेवीदारांना न्याय देण्यास निष्प्रभ ठरल्याचा निषेधार्थ बुधवारी दिवसभर जनसंग्राम ठेवीदार संघटनेने येथील सहकार तालुका निबंधक यांच्या कार्यालयात आक्रोश आंदोलन केले. जिल्हा निबंधकांनी आदेश देऊन सुद्धा ठेवीदारांच्या आढावा बैठकीला उपस्थित न राहणार्या निबंधकांच्या खुर्चीला ’बेशरमी’ भेट देऊन ठिय्या मांडला तर धनादेश न मिळेपर्यंत अटकेत राहण्याचा पवित्रा घेण्यात आल्याने सहकार विभागात मोठी खळबळ उडाली.
ठेवीदारांकडून सहकार विभागाचा धिक्कार
संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात रावेर तालुक्यातील पतसंस्थाच्या ठेवीदारांनी बुधवारी सकाळी 11 वाजता येथील तालुका सहकार निबंधकांचे कार्यालय गाठले. जिल्हा उपनिबंधक एम.यु.राठोड यांच्या आदेशाने ठेवीदारांना आजच्या आढावा बैठकीत अंशतः धनादेश वाटप करण्यात येणार होते मात्र तालुका निबंधक एस.एफ.गायकवाड निवडणुकीच्या बैठकीला जळगाव येथे असल्याने ठेवीदारांचा एकच संताप झाला. ठेवीदारांनी सहकार विभाग ठेवी परत करण्याच्या अंमलबजावणीत अगदी बेशरम भूमिका घेत असल्याने तीकात्मक बेशरमी वनस्पती निबंधकांच्या खुर्ची व टेबलवर ठेवून सहकार विभागाचा धिक्कार केला.
जेलभरो व चेक न मिळेपर्यंत अटकेत राहण्याचा पवित्रा
तालुका सहकार कार्यालयात ठेवीदारांना सामोरे जाणारे कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने व ठेवींबाबत ठोस आश्वासन मिळत नसल्याने संघटनेने रावेर पोलिसांना अटक करण्याची मागणी करत लेखी तक्रार दिली. यात तालुका कार्यालयाला टाळे ठोकून कायदेभंग करण्याचा ईशारा देऊन जोपर्यंत ठेवींचे चेक मिळत नाहीत तोपर्यंत जामीन न घेता अटकेत राहण्याचा पावित्रा जाहीर करून ठिय्या चालूच ठेवला. पोलिस उपनिरीक्षक अमृत पाटील व गोपनीय शाखेचे करोडपती यांनी आंदोलकांचा रोष शांत करून तालुका निबंधक यांनी आठ दिवसांत ठेवीदारांच्या मागणीची पुर्तता करण्याचे लेखी पत्र घेऊन यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात डी.टी.नेटके, यशवंत गाजरे, कमल भिरुड, पंडित नेमाडे, गणेश सराफ, मीनाक्षी कांचन नेहते, नरहरी झांबरे, कलाबाई पाटील, गिरधर नारखेडे, सुभद्रा चौधरी, यादव फालक, प्रमिला पाटील, वसंत गाजरे, शोभा ढाके, प्रल्हाद बोरोले, मंगला फेगडे, महेश चोपडे, खालीदा शेख, खेमा बोंडे, शोभा पाटील, रमेश बोंडे, कविता पाटील, विजय देशमुख, सुमन ढाके, यशवंत नेहते, सुमन चौधरी, विलास बेंडाळे, पद्माबाई बोरसे, लता चौधरी, देविदास फिरके, कमल महाजन, मधुकर भिरुड, बाळू नेमाडे आदी ठेवीदारांनी आंदोलनात सहभाग घेतला.