रावेर : रावेर एस.टी.महामंडळातर्फे प्रवासी वाहतुकीबरोबर आता माल वाहतुकही केली जाणार आहे. एस.टी.महामंडळाच्या येथील आगारातून संपूर्ण राज्यात माल वाहतुकीची सुविधा नागरीकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन झाल्यानंतर संपूर्ण राज्यात एस.टी.ची प्रवासी सेवा बंद करण्यात आली होती त्यामुळे या दीड-दोन महिन्यांच्या काळात महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. प्रवासी वाहतुकीत सरस असलेल्या एस.टी. महामंडळाने आता मालाच्या वाहतुकीलाही सुरुवात केली आहे. रावेर आगारातून राज्यभरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये धान्य, फळे, भाजीपाला व इतर कुठल्याही मालाची वाहतूक करता येणार आहे. यासाठी एस.टी.महामंडळाने स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे. यासाठी तालुक्यातून राज्यात माल पाठवणार्या नागरीकांनी आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आगार प्रमुख नीलेश बेंडकुळे यांनी केले आहे.