निषेध मोर्चे काढून जाग आली नाहीतर मंत्र्यांना घेराव घालणार
राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आक्रमक
मुंबई-राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, भारनियमन, पेट्रोल-डिझेलचे दिवसागणिक वाढणारे भाव आणि महागाईची झळ याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मैदानात उतरला असून १५ ते २० ऑक्टोबरला म्हणजे आठवडाभर राज्यभर निषेध मोर्चे काढण्यात येणार आहेत शिवाय या मोर्चाने सरकारला जाग आली नाही तर मंत्र्यांच्या गाडया अडवून घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली.
केंद्र आणि राज्यात असलेल्या भाजप-शिवसेना सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आठवडाभर तहसिल आणि उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चे काढण्यात येणार आहेत. या निषेध मोर्चाने सरकारला जाग आली नाही तर मंत्र्यांच्या गाडया अडवून त्यांना घेराव घालून जाब विचारला जाणार आहे.
पेट्रोल-डिझेलची दरवाढ… अनियमित वीजपुरवठा… वाढलेली महागाई… बेरोजगारी… आणि राज्यात भाजपप्रणीत उद्भवलेला गंभीर दुष्काळ यामुळे सर्वसामान्य जनता पुरती हैराण झाली आहे. मात्र हे सरकार या गोष्टीवर अदयाप गंभीर नाही त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आवाज उठवला आहे.
१५ ते २० ऑक्टोबरला निषेध मोर्चे काढतानाच उपविभागीय अधिकारी किंवा तहसिलदारांना या समस्यांचे निवेदनही दिले जाणार आहे असेही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सांगितले.