राष्ट्रवादीचे सरकारविरोधात २ ऑक्टोबरला राज्यभर धरणे!

0

मुंबई : केंद्र व राज्यसरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक,सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस २ ऑक्टोबरला राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन करत आहे. भाजपच्या प्रतिगामी धोरणांमुळे महात्मा गांधींनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे. त्यामुळे सरकारच्याविरोधात राष्ट्रवादीने आंदोलनाचे हत्यार उपसले असून २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर महात्मा गांधीजींच्या पुतळयाखाली बसून धरणे व मौनव्रत आंदोलन केले जाणार आहे.

राज्यासह मुंबईमध्ये मंत्रालयाजवळ महात्मा गांधीजींच्या पुतळयासमोर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आदी नेत्यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत महात्मा गांधींजींच्या पुतळयासमोर धरणे व मौनव्रत धारण करणार आहेत.