चाळीसगाव । गेल्या तीन वर्षापासून सत्तेवर असलेले भाजप शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे, अनेक पोकळ आश्वासने देऊन त्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. राज्यातील शेतकरी कष्टकरी कामगार लहान मोठे व्यावसायिक शिक्षक डॉक्टर अशा सर्वच स्तरात या सरकार बद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. केंद्रातील सरकारच्या नोटबंदी व जाचक जीएसटी निर्णयामुळे देशातील अर्थव्यवस्था पुर्णतः कोलमडून गेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नेमण्यात आलेले खाजगी क्षेत्रातील विशेष कार्यकारी अधिकार्यांनी राज्याचे प्रशासनच ताब्यात घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या गरजेनुसार आवश्यक असलेले विषय प्राधान्य क्रमाने न घेता बुलेट ट्रेन व समृद्धी महामार्ग यासारख्या अवाढव्य योजनांसाठी राज्याचा महसूल वळविला जात आहे. आत्महत्या हा विषय आता शेतकरी आणि शेतमजूर यांच्या पुरता सिमित न राहतो इतर अनेक क्षेत्रातही कोंडीच सापडलेले सामान्य नागरीक आत्महत्येसाठी प्रवृत्त होतील, अशी गंभीर परिस्थिती या शासनाने निर्माण केली आहे. राज्य सरकारच्या अनागोंदी आणि जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.