जळगाव : जळगाव शहरातील शंभर टक्के रस्ते खोदून ठेवलेले तर खड्ड्यांनी व्यापलेले असल्याने गेल्या तीन वर्षापासून जळगावकर खराब रस्त्यांमुळे हैराण झाले आहे. तर महापालिका निवडणूकीत भाजपने शहर खड्डे मुक्त करण्याचे आश्वासन देवून सत्ता मिळवली होती. परंतू भाजपची सत्ता येवून दोन वर्ष होवून देखील रस्ते खड्डे मुक्त झालेले नाही. त्यामुळे आज राष्ट्रवादी वक्ता विभागातर्फे खड्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.
जळगाव शहरातील साडेसहाशे किलीमीटरचे रस्ते अमृत योजने अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. यासाठी सर्व रस्ते खोदले जात आहे. तसेच मलनिस्सारण योजनेचे काम सुरू झाल्याने रस्ते खोदले जात आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते खराब झाले असून नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुश्कील झालेले आहे. तर वाहनधारकांना जीवमुठीत घेवून दररोज यातना सहन करत जावे लागत आहे. त्यानुसार या विरोधात राष्ट्रवादीच्या वक्ता विभागातर्फे केक कापून वाढदिवस राष्ट्रवादीचा वक्ता विभागाचे जिल्हाध्यक्ष साहील पटेल यांच्या नेतृत्वाखाली साजरा केला. यावेळी अशोक लाडवंजारी, श्री काकर, ममता तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार भोळेंना इशारा
शंभर दिवसात शहराचा विकास करू असे भाजपने आश्वासन देत महापालिकेत सत्ता मिळवली. तसेच आमदार राजूमामा भोळे यांनी देखील खड्डे दुरुस्त करू असे आश्वासन देत निवडून आले. परंतू शहरातील एक ही रस्ता आज चांगला नसून खड्यांमुळे अनेक नागरिकांना मणके, पाठीचे तसेच माणीचे आजार समोरे जावे लागत आहे. महापालिकेकडून खड्डे दुरुस्तीसाठी कोटी रुपये खर्च केल्याचे दाखवीत आहे तरी खड्डे जै से थे असून यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आला. तसेच त्वरित यावर उपाययोजना न केल्यास आमदार भोळेंना घराबाहेर पडू देणार नाही इशारा देखील यावेळी देण्यात आला.