जळगाव : गावात जाऊन राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी जे सामाजिक कार्य करतात ती देशसेवाच आहे. राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी शिबिरांमध्ये स्वत:सोबतच गावातील सर्वसामान्य माणसांची जाणीवाजागृती केली तर फार मोठे परिवर्तन होऊ शकेल असे मत 18 महाराष्ट्र बटालिया, जळगावचे सुभेदार मेजर भीम सिंग यांनी व्यक्त केले. ते मू.जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. शिबिर मौजे रायपूर, ता.जि. जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी एन.एस.एसचे सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश महाले, प्रा. योगेश बोरसे आदी उपस्थित होते.
सध्या देशपातळीवर हाती घेतलेल्या स्वच्छ भारत अभियान, लेसकॅश टू कॅशलेस या विषयांवर समाजप्रबोधन करण्याची गजरही सुभेदार मेजर भीम सिंग यांनी व्यक्त केले. माणूस म्हणून स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि शिस्त लागण्यासाठी अशी शिबिरे झाली पाहिजेत असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी महाविद्या.लयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी होते. डॉ. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुणाल इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन जयेश सूर्यवंशी याने तर आभार निखिल पाटील याने मानले.
शिबिरार्थ्यांमार्फेत रायपूर गावात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, केले जाणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक पल्लभकुमार व यशवर्धन यांचे पर्यावरण संवर्धन या विषयावर पक्षीमित्र गणेश सोनार यांचे, व्यसनमुक्ती व आरोग्य या विषयावर धडगाव येथील मेडिकल ऑफिसर डॉ. प्रज्ञा वळवी यांचे, अवयवदान: श्रेष्ठदान या विषयावर मुंबई येथील सेहवर्धन ट्रस्टच्या विश्वस्त मीरा सुरेश यांचे व्याख्यान या शिबिरात आयोजित करण्यात आलेले आहे. विविध सामाजिक विषयांवर पथानाट्य सादरीकरण केले जाणार आहे. या हिवाळी शिबिराचा समारोप 31 डिसेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता होणार आहे.