राहुल गांधींची अटक ही शेतकऱ्यांची मुस्कटदाबीच!

0

मुंबई – मध्य प्रदेशात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक करण्याची केलेली कारवाई म्हणजे शेतकऱ्यांच्या मुस्कटदाबीचाच प्रयत्न असल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, सध्याचे केंद्र सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने देण्यात आली होती. परंतु, आपलीच आश्वासने पाळण्यास हे सरकार साफ नकार देत आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे देशभरातील शेतकरी उद्धवस्त झाला असून वारंवार दाद मागितल्यानंतरही कर्जमाफी व हमीभावाबाबत ठोस निर्णय घेण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याने बळीराजासमोर रस्त्यावर उतरल्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही, असे ते म्हणाले.

काँग्रेसने नेहमीच शेतकऱ्यांची बाजू उचलून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आज राहुल गांधी मध्य प्रदेशात गेले होते. परंतु, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेणे आणि त्याविरूद्ध आवाज उठवणे गुन्हा ठरला आहे. कदाचित त्यामुळेच राहुल गांधी व इतर नेत्यांना अटक करण्यात आली. सरकारने दडपशाही करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यात त्यांना यश येणार नाही. शेतकऱ्यांसमोर त्यांना झुकावेच लागेल, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.