तिरुवनंतपुरम – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोन लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले आहे. अमेठीसोबतच ते केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान कॉंग्रेसच्या या निर्णयाविरोधात डाव्या पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे केरळमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांशी पुकारलेली थेट लढाई असून, येथे त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे डाव्या पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे.
सीपीएमचे माजी महासचिव महासचिव प्रकाश करात यांनी “वायनाड येथून राहुल गांधींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा काँग्रेसचा निर्णयाचा अर्थ आता केरळमध्ये डाव्यांविरोधात लढण्यालाच काँग्रेसचे प्राधान्य आहे, असा होतो. एकीकडे काँग्रेसवाले भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगतात. तर दुसरीकडे ते वायनाड येथून राहुल गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात’ असे सांगितले आहे.
केरळचे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ डावे नेते पी. विजयन यांनीही राहुल गांधी यांच्या वायनाड येथून निवडणूक लढवण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ” राहुल गांधी हे केरळमधील 20 पैकी एका जागेवरून निवडणूक लढवत आहेत. त्यातून काही वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही. आम्ही त्यांच्याविरोधात लढणार आहोत. राहुल गांधी यांना दोन ठिकाणांहून लढायचे होते तर त्यांनी जिथे विरोधात भाजपाचा उमेदवार असेल, अशा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे होती. काँग्रेसने आज घेतलेला निर्णय म्हणजे डाव्यांशी पुकारलेला थेट लढा आहे.”असे विजयन म्हणाले.