नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्या व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. आडवाणी हे आम्हाला पितृतुल्य आहेत. त्यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आम्हाला वेदना झाल्या आहेत. त्यांनी बोलताना संयम पाळावा, असे सुषमांनी म्हटले आहे.
चंद्रपूर येथील सभेत पंतप्रधान मोदींवर टीका करताना राहुल यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या अपमानाचा दाखला दिला होता. ’हिंदू धर्मात गुरू-शिष्याच्या नात्याला विशेष महत्त्व आहे. आडवाणी हे मोदींचे गुरू आहेत. मात्र, मोदी कुठलंही नाते मानत नाहीत. गुरू समोर आल्यानंतर साधे हातही जोडत नाहीत. त्यांनी आपल्या गुरूला बूटांनी मारून स्टेजवरून खाली फेकले आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. यावरुन सुषमा स्वराज यांनीही राहुल गांधींना सुनावले आहे.
Next Post