रेणुकाताईंमुळे अतिदुर्गम भागात अखंडितपणे पोहोचला पोषण आहार

0

नवापूर: नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणजे मोठेच संकट असते. प्रशासनालाही अशा भागात जाऊन काम करणे हे एक मोठे आव्हान असते. अशावेळी आपल्या लेकराला सोबत घेऊन लहान मुलांचा पोषण आहार नियमितपणे पाड्यावर पोहोचवण्याचे काम लॉकडाऊन काळात अंगणवाडी सेविका रेणुका वसावे यांनी केले आणि आजही करत आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा हे अत्यंत दुर्गम तालुके म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात नर्मदा काठावरील अंगणवाड्यात पोषण आहार पोहचवण्यासाठी प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या सर्व अडचणींवर मात करत नंदुरबार जिल्ह्यातील चिमलखेळी येथील 27 वर्षीय अंगणवाडी सेविका रेणुका रमेश वसावे या दररोज 18 कि.मी. बोट चालवत पोषण आहार वाटपाचे काम करतात. त्या एकट्याने बोट चालवत सकाळी 7:30 पर्यंत अंगणवाडीत पोहचतात, दुपारपर्यंत तेथे काम करतात. दुपारी जेवणानंतर बोटीने पाड्यावर जातात आणि संध्याकाळी उशिरा घरी परतात. अनेकदा त्यांना बालकांचे वजन काटे सोबत घेऊन पायपिट करत, डोंगर चढून वनवासी बांधवांपर्यंत पोहोचावे लागते.

कामात एक दिवसही खंड नाही
नर्मदा काठावरील वनवासी गर्भवती महिला बोटीत बसून एकत्रितपणे पोषण आहार घेण्यासाठी अंगणवाडीत येत असत, पण कोरोनाच्या भितीमुळे त्यांनी येणे बंद केले होते. त्यामुळे रेणुताई यांनी सहा वर्षांखालील बालके आणि गर्भवती महिलांच्या आरोग्य आणि विकासावर लक्ष केंद्रित केले. त्या सहा महिन्यांपासून नर्मदा नदी पार करत वनवासी पाड्यांपर्यंत पोहचत आहेत. दररोज बोट चालवून हात दुखत असले तरी लोकांची सेवा करत मी माझे दुःख विसरते अशा त्या म्हणतात. लॉकडाऊनच्या काळात अंगणवाड्या बंद होत्या, तरीही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. काम एकही दिवस बंद पाडले नाही. रस्ता नाही, वाहन नाही, डोंगरदर्‍यांचा भाग, कोणतीही सुविधा नसतांना बोटीतून जात पोषण आहार पोहचविण्याचे काम केले. कमी वेतन, अनेक अडथळे याचा विचार न करता बिकट परिस्थितीत काम केले.