नवी दिल्ली : प्रवाशाकडे रेल्वेचे कन्फर्म तिकीट असेल आणि ऐनवेळी काही कारणास्तव प्रवास करु शकणार नसाल, तर तिकीटाचे पैसे वाया जाणार नाहीत. कारण तिकीट आता दुसर्या प्रवाशाच्या नावेही ट्रान्सफर करता येणार आहे. कुटुंबातील व्यक्तीला किंवा अन्य व्यक्तीला ते तिकीट देता येईल. त्यासाठी प्रवासाच्या 24 तास अगोदर संबंधित व्यक्तीच्या नावे अर्ज करावा लागेल.
मुख्य आरक्षण पर्यवेक्षकाला अधिकार
काही महत्त्वाच्या स्थानकांवर मुख्य आरक्षण पर्यवेक्षकाला तिकिटावरील नाव बदलण्याचे अधिकार आहेत. तिकीट कुटुंबातील सदस्य म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती किंवा पत्नी यांच्या नावेही करता येईल. लग्नाच्या वर्हाडातील सदस्यांनाही तिकीट अन्य व्यक्तींच्या नावे करता येईल. तिकीटधारक सरकारी नोकर असल्यास प्रवासाच्या 24 तास आधी लेखी अर्ज करुन तिकीट दुसर्याच्या नावे करता येईल.