ठाणे । मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतेच काही उपनगरीय लोकलच्या डब्यातील आसन व्यवस्था बदलली आहे. आसन व्यवस्थेत बदल केल्यामुळे पूर्वी ज्या आसनांवर 32 प्रवासी बसून प्रवास करायचे. आता त्याच आसनांवर केवळ 14 प्रवासीच बसून प्रवास करू शकतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून लांब पल्याच्या उपनगरीय लोकलच्या प्रवाशांना सुरुवातीच्या स्थानकापासूनच ठाणे, कल्याण व पुढील रेल्वेस्थानकापर्यंत उभे राहून प्रवास करावा लागत आहे.लोकलच्या आसन व्यवस्थेतेतील बदलामुळे अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा येथील लांब पल्यावरुन येणार्या रेल्वे प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. सुरुवातीला आसनावर बसलेले सहप्रवासीही लांबचा प्रवास असल्याने इतर सहप्रवाशांना बसण्यासाठी जागा देत नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. त्यामुळे रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने उपनगरीय लोकल गाड्यांमधील आसनव्यवस्था बदलण्याअगोदर लांबच्या रेल्वे प्रवाशांचा विचार करायला हवा, अशी प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. त्या सर्व उपनगरीय लोकल गाड्या या केवळ कमी अंतरावरील प्रवासाकरताच चालवाव्यात. सीएसएमटी-कुर्ला तसेच कुर्ला-ठाणे मार्गावर अशा लोकल सोडल्यास प्रवाशांची फारशी गैरसोय होणार नाही. पण कर्जत-कसारापर्यंत आणि तेथून सीएसएमटीपर्यंत असा प्रवास करावा लागणार म्हणजे मरण यातनाच असल्याची प्रतिक्रिया कर्जत, कसार्याच्या प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नागरिकांसह गरोदर महिला, विद्यार्थी यांच्यासह शारीरिक त्रास असलेल्या प्रवाशांना होणार्या त्रासाचाही रेल्वे प्रशासनाने विचार करायला हवा, असेही मत व्यक्त होत आहे.
तर शारीरिक त्रास होतील
यावेळी, प्रवाशांना अडीच ते तीन तास ताटकळत प्रवास करावा लागत असल्याची खंत कर्जत प्रवासी संघटनेचे पदाधिकारी प्रभाकर गंगावणे यांनी व्यक्त केली. असे ताटकळत प्रवास करावा लागत असेल, तर हजारो प्रवाशांना अल्पावधीतच शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागेल, याचा विचार रेल्वे प्रशासनाने करावा आणि तातडीने बदल करावा, असे ते म्हणाले.