रेल्वे कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर रेल्वेतर्फे कुटुंबीयास एका दिवसात सर्व लाभ

0

रेल्वे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे कौतुक ; आठवडाभरात दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू

भुसावळ- रेल्वे प्रशासनात नोकरीवर असलेल्या दोन कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतर रेल्वे प्रशासनाने संवेदनशीलतेचा प्रत्यय देत कुटुंबियांना सर्व लाभ एका दिवसात मिळवून देत एका कुटुंबास अनुकंपा तत्वावर नोकरीही दिल्याने समाधान व्यक्त होत आहे. रेल्वेतील की मॅन धुनी बद्री ठाकूर यांचा मालगाडीचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना 11 मे रोजी घडली होती. रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेनंतर ठाकूर यांच्या कुटुंबियांना एका दिवसात सोमवारी मृत्यूदान, पी.एफ., सुटी वेतन, न्यू ग्रुप इन्शुरन्स स्कीम, पेन्शन भुगताप (पीपीओ) चा लाभ डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याहस्ते देण्यात आला. ठाकूर यांच्या मुलाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांना अनुकंपा आधारावर नोकरी देता आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

आठवडाभरात दुसरी दुर्दैवी घटना
गत आठवड्यात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील वरीष्ठ अनुभाग अभियंता राजेश भीमराज यांचा शनिवार, 4 मे रोजी रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला होता. रेल्वे प्रशासनाने या घटनेचीही गांभीर्याने दखल घेत एका दिवसात सोमवार, 6 रोजी अधिकार्‍यांच्या कुटुंबियांना वरीलप्रमाणे सर्व लाभ मिळवून दिले. सर्व लाभांचा धनादेश डीआरएम यांच्याहस्ते कुटुंबियांना देण्यात आला. डीआरएम आर.के.यादव, वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्मिक अधिकारी, लेखा अधिकारी, कर्मचारी, कल्याण निरीक्षक, कार्मिक इंजिनिअरींग व लेखा विभागाच्या कर्मचार्‍यांनी लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले.