नवी दिल्ली। येत्या काही दिवसांमध्ये रेल्वे तिकीट दरांत वाढ होण्याची शक्यता आहे. तिकीट दर वाढवण्यासाठी रेल्वेसमोर पाच वेगवेगळे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये एका महिन्यात एक टक्का भाडे वाढवण्यापासून ते एकाच वेळी दहा टक्क्यांची वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासंबंधी निर्णय अद्याप झाला नसून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूच यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडे आलेल्या प्रस्तावांमध्ये राजधानी, शताब्दी आणि दुरांतो ट्रेनमधील फ्लेक्सी फेअर योजना रद्द किंवा कमी करण्यात यावी असेही सुचवण्यात आले आहे. रेल्वे भाडे वाढवण्यासंबंधी पाच प्रस्ताव आले आहेत. रेल्वेला तिकीटातून मिळणार्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी ही वाढ करण्यात येणार आहे. मात्र अद्याप यासंबंधी निर्णय झालेला नाही, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली आहे.
दर महिन्याला एक टक्का भाडेवाढ
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकाच वेळी सगळी भाडेवाढ करण्याऐवजी एका महिन्यात एक टक्का भाडेवाढ करण्याचा नियम करण्याचा रेल्वे विचार करत आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशावर सगळा भार एकदम पडणार नाही. सोबतच रेल्वेला टीकेचा सामना करावा लागणार नाही. याचा दुसरा फायदा म्हणजे वर्षभरात किमान 12 टक्के भाडेवाढ करता येईल.
फ्लेक्सी फेअर योजना बंद करा
एका प्रस्तावात फ्लेक्सी फेअर योजना बंद करण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वेला या योजनेमुळे वर्षाला जवळपास सहा कोटींचा फायदा होत आहे. पण दुसरीकडे या योजनेमुळे प्रवाशांच्या नाराजीलाही सामोरे जावे लागत आहे. ही योजना पुर्णपणे रद्द तरी करू शकतो किंवा कमी करू शकतो असे रेल्वे बोर्डाचे म्हणणे आहे. म्हणजेच दहा टक्के जागांवर दहा टक्के भाडे वाढवण्याऐवजी पाच टक्केच वाढ करावी.
काय आहे फ्लेक्सी फेअर योजना
या योजनेतंर्गत पहिले 10 टक्के सीट्स साधारण दराने विकणे, त्यानंतरचे 10 टक्के सीट्स साधारण तिकिट दरापेक्षा 10 टक्के जास्त दराने विकणे, त्याच्या पुढील 10 टक्के सीट्ससाठी साधारण तिकिट दरापेक्षा 20 टक्के अधिक दर आकारणे, त्यापुढील 10 टक्के सीट्सला साधारण दरापेक्षा 30 टक्के अधिक दर, असे 50 टक्के अधिक दराने तिकिट विकणे.
एकत्र 10 टक्के भाडेवाढ
तिसर्या प्रस्तावात सांगण्यात आले आहे की, जर फ्लेक्सी फेअर योजना रद्द केली जात असेल तर सर्व ट्रेनमधील सर्व डब्यांमध्ये दहा टक्के भाडेवाढ केली जावी. सध्या रेल्वेला तिकीट विक्रीतून 45 कोटींचे उत्पन्न रेल्वेला मिळत आहे. दर दहा टक्के भाडेवाढ केली तर साडेचार हजार कोटींचे उत्पन्न मिळू शकेल. दुसर्या एका प्रस्तावात पाच टक्के भाडेवाढ करण्याचे सुचवले आहे.
सेकंड क्लासवर ओझे नको
सेकंड क्लासच्या प्रवाशांवर तिकीट दरवाढीचे ओझं टाकू नये असेही एका प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार गरीब कल्याण योजनेबद्दल बोलत असतात. अशा परिस्थितीत रेल्वे गरिबांकडे दुर्लक्ष करत असल्याचा संदेश जाऊ नये, असा या प्रस्तावामागील उद्देश आहे. मात्र दुसकीकडे काही जणांनी सेकंड क्लासच्या भाड्यात कमी का होईना पण वाढ झाली पाहिजे असे म्हटले आहे.