रेशनिंग धान्यवाटपावरुन होणारी सरकारची बदनामी टाळा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सर्व पालकमंत्र्यांना पत्र
मुंबई – करोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशन दुकानांमधून दिल्या जाणार्या धान्य वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्यवाटप सुरळीत व्हावे आणि शासनाची विनाकारण होणारी बदनामी टाळावी, यासाठी सर्वं पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना केले आहे.
अजित पवार यांनी सर्व पालकमंत्र्यांना पत्र लिहून रेशन दुकानांमधून पुरेसे अन्नधान्य उपलब्ध केले जात असतानाही तक्रारी वाढत असल्याकडे लक्ष वेधले आहे. राज्यात सर्वत्र धान्यवाटप सुरु असून काही जिल्ह्यांमधून येणार्या तक्रारींमुळे शिधावाटप यंत्रणेची, शासनाची नाहक बदनामी होत आहे. ही बदनामी टाळली पाहिजे. त्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील शिधावाटप यंत्रणेत गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गरीब नागरिकांना पुरेसे धान्य मिळावे, धान्याचे सुरळीत वाटप व्हावे, कुणीही उपाशी राहू नये, कुणाचीही तक्रार राहू नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. राज्यातील करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा सर्व स्तरावर उत्तम काम करत असल्याचे सांगून अजित पवार यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे. शिधावाटप यंत्रणेसंदर्भातील सूचना व तक्रारींसाठी राज्य शासनाने राज्य स्तरावर १८००२२४९५० आणि १९६७ हे टोल फ्री दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. त्यावर संपर्क साधून सूचना द्याव्यात, तक्रारी दूर कराव्यात, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.