रोझलँड सोसायटीचा ‘पाणी बचती’चा आदर्श; रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे

0

सोसायटीचे पर्यावरणपूरक उपक्रम

पिंपरी : शहरांमध्ये वाढत्या नागरिकरणांमुळे दिवसेंदिवस पाणी टंचाई, विस्कळित पाणीपुरवठा या सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ही समस्या व भविष्यातील पाण्याची गरज ओळखून सोसायटी स्वत:साठी स्वत:च पाणी उपलब्ध करू शकते. हेच रेनवॉटर हार्वेस्टिंग! पाण्याचा पुनर्वापर, मर्यादित वापर आणि प्रत्येक घरातील गळती बंद करून रोझलँड सोसायटीने पाणी वाचवून दाखवून दिले. ‘पाणी बचती’चा एक आदर्श शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना घालून दिला, असे मत रोझलँड सोसायटीचे अध्यक्ष संतोष म्हसकर यांनी मांडले. पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीने पाणी, घनकचरा व्यवस्थान व इतर पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीरित्या राबविले. त्यासाठी सोसायटीचा राज्य व राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे.

पाणी टंचाईची समस्या व त्यावर केलेल्या उपायांबद्दल बोलताना संतोष म्हसकर म्हणाले की, रोझलँड सोसायटीमध्ये एकूण 35 इमारती असून सुमारे साडेतीन हजार लोकसंख्या आहे. 2006 पासून या सोसायटीमध्ये रहिवाशी राहतात. पिंपळे सौदागर भागात सुरुवातीला कमी लोकसंख्या असताना पाणी, कचर्‍याची समस्या कुणालाही जाणवत नव्हती. परंतु, हळूहळू या भागातील नागरिकरणात भर पडल्यानंतर पाणीटंचाई जाणवू लागली. त्यावर टँकरचा पर्याय होता, परंतु तो सोसायटीच्या दृष्टीने अधिक खर्चिक होता. तो परवडणारा नसल्याने आम्ही इतर माहिती घेतली. आम्हाला जाणकारांकडून रेनवॉटर हार्वेस्टिंगची माहिती मिळाली. त्यासाठी पारनेर तालुक्यातील हिवरे बाजार या गावी भेटही दिली.

2008 पासून टँकर नाही
नंतर 2008 पासून सोसायटीत तीन बोअरवेलचा वापर करून रेनवॉटर हार्वेस्टिंग सुरू करण्यात आले. सध्या 22 बोअरवेल सोसायटीत असून एकही टँकर आम्हाला मागवावे लागत नाही. पाणीबचतीसाठी दुसरा पर्याय म्हणून नळावाटे मर्यादित पाणी वापरासाठी प्रयत्न केले. पुढे प्रत्येक घरातील गळती शोधून ती बंद करण्यावर भर दिला. त्यातून सोसायटीची 25 टक्के पाणीबचत होऊ शकली आहे. या प्रकारे नागरिकांकडून गळती कमी करून देखील सोसायट्या मोठ्या प्रमाणात पाणी वाचवू शकतात. वापराच्या पाण्यासाठी 30 हजार लिटरची टाकी व पिण्यासाठी 4 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. पिण्यासाठी सकाळी व संध्याकाळी 15 मिनिटे फक्त महापालिकेचे पाणी वापरतो. इतर वेळी रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या पाण्याचा वापर करतो. किती पाणीटंचाई असेल, तरी इथे 24 तास 7 दिवस पाणीपुरवठा उपलब्ध असतो.

मोठी सोसायटी असताना अतिशय कमी पाणीपट्टी पालिकेला येत असून 40 ते 45 टक्के पाणीपट्टी या प्रकल्पामुळे कमी झाली आहे. अनेक सोसायट्यांचे लाखो रुपये महिन्याला टँकरसाठी खर्च केले जातात. याची जनजागृती आम्ही सोसायट्यांमध्ये केली. त्यालाही चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला असून पिंपळे सौदागरमधील अनेक सोसायट्या टँकरमुक्त झाल्या आहेत. पाण्याची समस्या या भागात सोडविण्यामध्ये योगदान दिल्याचा आम्हाला आनंद आहे. यापुढे देखील आम्ही थांबणार नसून यासाठीचे वेगवेगेळे प्रयत्न सुरू ठेवणार आहोत.