रोहिंग्या दहशतवादीच; जगनिंदेला घाबरत नाही!

0

नवी दिल्ली : म्यानमारमधील हिंसाचाराला रोहिंग्या मुसलमानच जबाबदार असून, दहशतवादी कारवायांमध्येही त्यांचा हात आहे. देशहितासाठीच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. म्यानमारमध्ये कायदा-सुव्यवस्था व स्थैर्य राखण्यास आम्ही कटिबद्ध असून, जगाच्या निंदेला घाबरत नाही, अशी ठाम भूमिका म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान स्यू की यांनी स्पष्ट केली आहे.

देशाला संबोधित केले
रोहिंग्या मुसलमानांविरोधात म्यानमार लष्कराने धडक कारवाई सुरू केल्याने हजारो रोहिंगे शेजारच्या देशात पलायन करत आहेत. या घटनाक्रमानंतर जागतिक मानवी हक्क संघटनांसह काही देशांकडून म्यानमारवर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान स्यू की यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले आणि आपली स्पष्ट भूमिका मांडली.

प्रत्यक्ष परिस्थितीची पहावी
म्यानमारमध्ये मानवी हक्कांच्या पायमल्ली होत असेल तर ते चिंताजनक आहे. मात्र, एका घटनेवरून म्यानमारबद्दल रंगवले जाणारे चित्र चुकीचे आहे. जगाने एका छोट्या भागातील हिंसाचारावरून म्यानमारचे मूल्यमापन करू नये. म्यानमारकडे देश म्हणून पाहावे. हिंसाचारानंतर ज्यांना आपली घरे सोडावी लागली, त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. देशात परतण्याची इच्छा असलेल्यांना सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारमध्ये येऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी. आम्ही घाबरत नाही, असे स्यू की म्हणाल्या.

साल्वेशन आर्मी दहशतवादी संघटना
आँग सान स्यू म्हणाल्या, गेल्या वर्षभरापासून मुस्लीम कट्टरपंथीय पोलिस ठाण्यांना लक्ष्य करत आहेत. 25 ऑगस्टरोजी पोलिस ठाण्यावर रोहिंग्या मुसलमानांनी केलेल्या हल्ल्यामुळेच हा हिंसाचार भडकला आहे. अनेकांची घरेही जाळण्यात आली. त्यामुळे रोहिंग्या साल्वेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले, अशी माहिती स्यू की यांनी दिली.