नवी दिल्ली । रोहिल वेमुला हा दलीत नसून त्याने विद्यापीठातील प्रशासनाच्या दबावामुळे आत्महत्या केली नसल्याचा निष्कर्ष या प्रकरणी गठीत करण्यात आलेल्या न्यायालयीन समितीने बुधवारी सादर केला आहे. यात माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि भाजप नेते बंडारू दत्तात्रेय यांनाही क्लीन चीटही दिली असून यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
प्रचंड गाजलेल्या रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचा अहवाल बुधवारी न्यायालयीन समितीकडून सादर करण्यात आला. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या या एक सदस्यीय समितीच्या अहवालात अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. रोहित हा त्याच्या घरगुती समस्यांमुळे चिंतेत होता. त्यामुळे तो नाखूश असायचा. त्याच्या मृतदेहाशेजारी सापडलेल्या चिठ्ठीवरूनही ही बाब स्पष्ट होते. ‘मी लहानपणापासून एकटाच पडलो आणि मला कुणी आपलं मानलंच नाही’, अशी खंतही त्याने चिठ्ठीत व्यक्त केली होती. तसेच त्याने आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरले नव्हते. विद्यापीठाच्या निर्णयावर तो नाराज असता तर त्याने नक्कीच विरोध दर्शवला असता, असेही अहवालात सांगण्यात आले आहे. हैदराबाद विद्यापीठाने कारवाई केल्यानंतर रोहित वेमुलाने 17 जानेवारी 2016 रोजी वसतिगृहातल्या खोलीत आत्महत्या केली होती. परंतु त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात मोठे आंदोलन पेटले होते.