नागपूरः शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीने सरकार आल्यास कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जमाफीची मागणी होऊ लागली आहे. विरोधकांकडून कर्जमाफीसाठी प्रचंड दबाव टाकला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची बैठकही झाली होती. दरम्यान आज शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याचे सांगितले. शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरू आहे. आधार क्रमांक लिंक करून कर्जमाफी देता येईल का, याचीही चाचपणी सुरू असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.
सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे निश्चितपणे भूमिका घेतली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी पैसा कमी पडला जाऊ नये, याचेही नियोजन सरकारला करावे लागणार आहे. त्यामुळे काही अवधी लागणार आहे. कर्जमाफीचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना व्हावा, हा हेतूही कर्जमाफी देताना जोपासला जाणार आहे. फेबु्रवारी महिन्यानंतर होणाऱ्या नवीन अधिवेशनात आढावा घेऊन यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले.