मुंबई: राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मिळून सरकार स्थापन झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्यात सरकार स्थापन करण्याचा पेच निर्माण झाला होता. राज्यात तिन्ही पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. प्रसारमाध्यमांसमोर शिवसेनेची प्रमुख भूमिका त्यांनी मांडली होती. महाराष्ट्रानंतर गोव्यातही लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने भाजपामध्ये खळबळ उडाली आहे.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आज सकाळी राऊत यांनी हा दावा केला. ‘गोव्यातही भाजपाने अनैतिक पायावर आधारलेले सरकार स्थापन केलेले आहे. त्यामुळे शिवसेनेचे महाराष्ट्रानंतर आता मिशन गोवा असेल. आताच माझे सुधीर ढवळीकरांशी बोलणं झालं आहे. गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे प्रमुख विजय सरदेसाईंसह चार आमदार आमच्या संपर्कात आहेत,’ असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
गोव्यासह संपूर्ण देशभरातच भारतीय जनता पक्षाविरोधात शिवसेना राळ उठवणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. दरम्यान, येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.