मुंबई: सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नाही. शिवसेनेकडून दररोज नवनवीन वक्तव्य समोर येत आहे. दरम्यान आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. जवळपास ४० मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलतं यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची गरज आहे आणि ते बनेल त्यासाठी आम्ही पूर्ण आश्वस्त आहोत, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत बोलण्याचे टाळले.
‘राज्यात ३२५ तालुक्यात शेतीचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची आवश्यकता आहे. यासंदर्भातल्या केंद्र सरकारच्या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री असतात. त्यामुळे मी अमित शहांची भेट घेतली असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.