वरसगाव । स्वातंत्र्यदिनी पर्यटनासाठी वरसगाव धरण भागात असणार्या दासवे येथील लवासाच्या दिशेने जात असलेल्या गुजरातमधील एका प्रवासी बसचे ब्रेक निकामी झाले. घाट रस्त्यावरील संरक्षक कठडे तोडून बसची चाके दुर्गम कड्यावरील दगडात अडकली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि बसमधील 50 पर्यटकांचे प्राण वाचले.
मंगळवार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लवासा घाट रस्त्यावर टेमघर धरणाजवळील कांगुरमाळच्या खिंडीत हा अपघात झाला. या बसमध्ये महिला, मुलांसह 50 हून अधिक पर्यटक होते. गुजरातमधील सुरत येथून सर्वजण पर्यटनासाठी लवासाकडे एका खाजगी प्रवासी बसमधून जात होते. टेमघर धरणाच्या शेजारील लवासा घाट रस्त्याची दोन वळणे ओलांडून तिसर्या वळणावर ही बस घाट रस्ता पार करत असताना अचानक बसचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्याची भिंत तोडून डोंगराच्या कड्याच्या दिशेने खाली गेली. तेथे असलेल्या दगडांत बसची पुढील चाके अडकली. त्यामुळे बसचा पुढील भाग खाली गेला आणि पाठीमागील वर उचलला गेला. त्यामुळे बस कड्यावरून खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. लवासा जवळील गडले येथे कारमधून जात असलेल्या स्थानिक मावळा जवान संघटनेचे कार्यकर्ते शंकर दोन्हे, बाळासाहेब शिंदे, दत्ता दोन्हे यांना घाट रस्ता सोडून खोल दरीच्या दिशेने जात असल्याचे पाहिले. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी तातडीने धाव घेतली. रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांच्या मदतीने महिलांसह सर्व जणांना बाहेर काढले.