मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी चक्क चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांना व त्यांच्या कुटुंबियांना बसण्यासाठी जागा मिळाली नाही. यावरून संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्यात झालेल्या मानापमान नाट्यामुळे शिवसेना आणि मनसे आमने-सामने आले आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या मानापमान नाट्यानंतर अभिजित पानसे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. “लहान मेंदूत कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते”, ठाकरे चित्रपटामधून हाच संदेश देण्यात आला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी ट्विरवरून केली आहे.
वडाळ्यातल्या कार्निव्हल आयमॅक्समध्ये ‘ठाकरे’ चित्रपटाची स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. स्क्रीनिंगला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने सिनेमागृह फुल्ल झाले होते. अशातच चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले अभिजित पानसेंसह कुटुंबीयांना स्क्रीनिंगला बसण्यासाठी पुढच्या रांगेत जागा आरक्षित करण्यात आली होती. परंतु एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मागच्या बाजूला जागा आरक्षित ठेवण्यात येते. मात्र सिनेमागृहात बसण्यासाठी मागच्या बाजूला जागा न मिळाल्यानं अभिजित पानसे प्रचंड संतापले. त्यानंतर चित्रपटाचे निर्माते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राऊतांचं ऐकून न घेता ‘ठाकरे’च्या स्क्रीनिंगमधून अभिजीत पानसे कुटुंबीयांसह तडकाफडकी निघाले. त्यामुळे स्क्रीनिंगला उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर चित्रपटापेक्षा या वादाचीच सुरुवात अधिक झाली.