लॉकडाउन फायदा घेत गोमाई नदीतून वाळूची बेसुमार चोरटी वाहतूक

0

शहादा – कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशात प्रचंड धुमाकूळ माजवल्याच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण देशाला लॉकडावून करीत सरकारने संचारबंदी लागू केली आहे. मात्र वाळू वाहतुकीबाबत कोणताच ठेका नसताना शहादा परिसरातील अवैध रेतीची चोरी करणाऱ्या तस्करांनी आपला गोरखधंदा कायम ठेवीत दिवस – रात्र करत ट्रॅक्टर ने रोजच गोमाई नदीतून रेती चोरून परिसरात विकत असल्याने यांनी लॉकडाऊन आणि संचार बंदीच्या नियमाची ऐशीतैशी करून टाकली आहे. मात्र संबंधित कारवाई करणारा विभागाचे लॉकडाऊन मुळे या वाळू चोरी कडे दूर्लक्ष होतांना दिसत आहे.

 

शहादा शहराला लागून वाहणारी गोमाई नदी पात्रातून राजरोसपणे कोणताही धाक न बाळगता दिवसा ढवळ्या ट्रॅक्टरच्या साहयाने अवैधरित्या रेती भरून परिसरात रेती विकण्याचा सपाटा लावलेला आहे. याविरोधात कारवाई करणारा विभाग कोरोना या संसर्गजन्य आजारावर उपाय योजना आणि अंमलबजावणी करीता कायमस्वरूपी जिवाचे रान करीत आहे आणि याच गोष्टीचा फायदा शहादा येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे रेती माफियांची चांगलेच फावले आहे.

शहराला लागून वाहणाऱ्या गोमाई नदीतून चोरीछुपे रित्या नेहमीच वाळूची चोरी केली जाते. मात्र आता कोरोनाचे संकट असल्याने संपूर्ण महसूल विभाग या संकटाचा सामना करण्यासाठी लागल्याने त्याचा फायदा घेत लोणखेडा, मलोणी, तिखोरा व शहरातील भावसार मढी समोरच्या नदीपात्रा मध्ये ट्रॅक्टरच्या जमावळा रोज बघायला मिळतो आहे. रात्रीचा आश्रय घेऊन चढ्या दराने शहादा परिसरात चोरीची रेती विकण्यात येत आहे. हा रोज नित्याच्या प्रकार नागरिकांना अनुभवास येत आहे. मात्र यावर कोणीही अंकुश लावताना दिसत नाही. राजकीय वरदहस्त आणि अर्थकारणाची खिचडी शिजल्याशिवाय हे शक्य नाही असे सुजाण नागरिक आता बोलू लागले आहेत.

सध्या कोरोना व्हायरस प्रादुर्भाव सुरू असल्याने ग्रामसेवक, तलाठी आदी शासकीय कर्मचारी हे आपल्या नेमणुकीच्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्ष असताना दिवसा ढवळ्या राजरोसपणे नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक होत असताना या शासकीय कर्मचाऱ्यांना ती दिसत नसेल का? दिसत असेल तर कायद्याच्या कोणताही धाक न बाळगता बिनधास्त पणे वाळू वाहतूक करणार्‍यांवर कारवाई का होत नाही. असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडत आहे.

शहरातील नागरिकांमध्ये कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार व प्रशासन अतिशय परिश्रम घेत दिवस-रात्र करत शहरातील विविध भागांमध्ये जात आहे. तरी शासनाच्या कोणताच धाक न बाळगता शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नदी पात्रातून दिवसा ढवळ्या रेतीची चोरटी वाहतूक होतांना दिसत असल्यामुळे आचर्य व्यक्त होत आहे.

एकीकडे लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे हातावर पोट भरणारे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत तर दुसरीकडे संचारबंदी ऐशीतैशी करीत नदी पात्रातून अवैधरित्या चोरट्या रेतीमुळे माफिया मालामाल होताना दिसत आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम या रेतीची चोरी करणाऱ्या माफियांना नाही काय? असा सवाल यानिमित्ताने उभा झालेला आहे.