जळगाव :- तृतीयपंथीय हे समाजातील एक घटक आहेत. मात्र त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल करून घेण्याची मानसिकता अजूनही आमच्यात नाही. त्यामुळे हा वर्ग नेहमीच उपेक्षित व दुर्लक्षित राहिला. लग्न समारंभ, बाळाचा नामकरण विधी,किंवा अन्य कार्यक्रमात गायन, नृत्य करून गुजराण तृतीयपंथी आपली उपजिवीका भागवित असतात. मात्र कोरोना व लॉकडाऊनमुळे उपजिविकेचे कुठलेही साधन नसल्याने तृतीयपंथीयांवरही उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. अशा जळगावातील दुर्लक्षित तृतीयपंथीयांच्या मदतीसाठी कृती फाउंडेशन सरसावले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात राहणार्या तृतीयापंथीयांचा शोध घेऊन त्यांना महीनाभर पुरेल अशा जीवनावश्यक किराणा सामानाचे फाउंडेशनतर्फे वाटप केले.
तृतीयपंथीयांच्या चेहर्यावर फुलविले हास्य
सध्या लाँकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्यामुळे तृतीयपंथीयांची स्थिती अत्यंत दयनीय झाली. जनजीवन विस्कळीत व ठप्प झाल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत. दै. जनशक्तिने आपल्या फेसबुक लाईव्हच्या बातमीव्दारे तृतीयापंथीयांवर उपासमारीची वेळ असे वृत्त प्रसारीत करुन त्यांच्या व्यथा मांडल्या होत्या. तसेच सामाजिक संस्थांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्यानुसार कृती फाउंडेशनने शहरातील शिवाजीनगर, गेंदालाल मिल परीसर, जुना ममुराबाद नाका, शनिपेठ, अजिंठा चौफुली या ठिकाणी वास्तव्य करीत असलेल्या सुमारे 35 तृतीयपंथीयांना मदतीचा हात दिला आहे. तसेच त्यांची उपासमार दूर करण्याचा प्रयत्न करुन चेहर्यावर हास्य फुलविले आहे.
उपक्रमासाठी लाभले यांचे सहकार्य
कृती फाऊंडेशनचे सचिव जी.टी.महाजन, डॉ श्रद्धा माळी, कपिल महाजन, यांच्या कल्पक व दुरदृष्टीतून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत महाजन, कार्याध्यक्ष व पोलिस बिन्तारी संदेश विभागाचे अमित माळी, डी टी महाजन, डॉ मनिषा महाजन, चेतन निंबोलकर, पुणे येथील उषा रामदास कोंडा, अजित कोंडा यांचे सहकार्य लाभले. या मदतीबद्दल तृतीय पंथीयांच्या रानी गुरू , सविता आपा, करीना, शमिमा, राशीबेन अर्चना बेन यांनी फाउंडेशनचे आभार व्यक्त केले .