लॉकडाऊन: गावाकडे पायी जाणार्‍या ७जणांना टेम्पोने चिरडले; ५ ठार

0

ठाणे: लॉकडाऊनचा धसका घेऊन आपल्या गावी गुजरातला पायी जात असताना विरार येथे सात जणांना एका भरधाव टेम्पोने उडविले. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज पहाटे साडेतीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने हातावर पोट असणार्‍या अनेक कामगारांनी त्याचा धसका घेतला आहे. काम बंद झाल्याने उपासमारीची वेळ आल्यामुळे शेकडो कामगार आपआपल्या मूळगावी पायीच निघाले आहेत. काल संध्याकाळीही काही कामगार गुजरातला पायी निघाले होते. पहाटे साडे तीनच्या सुमारास हे कामगार मुंबई-अहमदाबाद मार्गावरून जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना जाण्यास मनाई केल्यानंतर हे सर्व कामगार माघारी फिरले. वसईकडे जात असताना विरार हद्दीतील भारोल परिसरात एका भधाव आयसर टेम्पोने पाठिमागून येऊन त्यांना धडक दिली. हा आयसर टेम्पो सातजणांना चिरडून वेगाने निघून गेला. या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत.