जामनेर। तालुक्यातील लोंढ्री येथील माहेर असलेल्या विवाहितेने घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये न आणल्याने छळ करण्यात आला. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जामनेर तालुक्यातील लोंढ्री येथील माहेर असलेल्या भाग्यश्री मुकेश मोरे (25) यांचा विवाह उल्हासनगर ठाणे येथील मुकेश आत्माराम मोरे यांच्याशी झाला होता. लग्नाच्या दोन महिन्यानंतर पती मुकेश याने अपार्टमेंटमध्ये घर घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत म्हणून मागणी केली परंतु विवाहितेने पैशांची पूर्तता न केल्यामुळे पतीकडून शिविगाळ व मारहाण करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सासरे, सासू, सासरे, जेठ आणि ननंद यांनी देखील पैशासाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता या लोंढ्री येथे माहेरी निघून आल्या. शुक्रवार, 8 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.
त्यांच्या तक्रारीवरून पती मुकेश आत्माराम मोरे, सासरे आत्माराम उत्तम मोरे, सासू सुशिलाबाई आत्माराम मोरे, जेठ राजेश आत्माराम मोरे (सर्व रा.उल्हासनगर, ठाणे), नणंद ज्योती सुशील मिस्तरी (उधना, सुरत) आणि मेघा गोकुळ मिस्त्री (पुणे) यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ. भरत लिंगायत करीत आहे.