लोकपालप्रश्‍नी पुन्हा आंदोलन करणार

0

अहमदनगर : लोकपाल नियुक्तीच्या प्रश्‍नावर आता पुन्हा एकदा आंदोलन करावे लागणार आहे. दिल्लीत असे आंदोेलन करण्यासाठी मी तयार आहे. माझे मनही मला सांगते आहे, की पुन्हा एकदा आंदोलन कर. मी त्यासाठी तयार आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी येथे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंदोलनाची तारीख मी लवकरच कळवणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अण्णा हजारे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकपाल नियुक्तीच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. केंद्र सरकारला लोकपाल नियुक्त करण्याची इच्छा नाही. लोकपालाची नियुक्ती शक्य नसेल तर निदान राज्यांमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती केली जावी. ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, तेथे लोकायुक्त नेमण्यात काय अडचण आहे, असा सवाल हजारे यांनी केला.

लोकपाल कायदा व्हावा ही जनतेची ‘मन की बात’ होती. पूर्वीच्या सरकारने त्यासाठी कायदा केला, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. हा जनतेच्या भावनांचा अपमान आहे. लोकांना वाटतेय की अण्णा हजारे गप्प बसले आहेत, पण मी गप्प बसलेलो नाही. आता पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल असे वाटते. दिल्लीत जाऊन ते करण्यासाठी तयार आहे. माझे मनही मला सांगत आहे, पुन्हा एकदा आंदोलन कर. मी त्यासाठी तयार आहे, असे ते म्हणाले.

मी लवकरच पंतप्रधानांना पत्र लिहून आंदोलनाची तारीख कळवणार आहे. या आंदोलनासाठी फेसबुक पेजही तयार करण्यात आले आहे. नागरिकांनी हे पेज लाईक करून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही हजारे यांनी केले. मोदी सरकार सत्तेवर येवून तीन वर्षे होत आहेत. मात्र, देशातील भ्रष्टाचार अद्याप थांबलेला नाही, अशी टीकाही हजारे यांनी केली.