मुंबई । वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होऊन लोकप्रतिनिधींनी पर्यावरण रक्षणाचा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नुकतेच वृक्ष लागवड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते. परिषदेस ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पदुम मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेत चंद्रपूर आणि बल्लारशाह रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण करणार्या नागपूर येथील चित्रकला महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, 4 जुलै 2018 पासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होत असले तरी प्रत्येक लोकप्रतिनिधीनी 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत होणार्या वृक्ष लागवड कार्यक्रमात आपापल्या कार्यक्षेत्रात कार्यक्रम आयोजित करून त्यात सहभागी व्हावे.
वन की बात- ते पुढे म्हणाले, हे सर्वांनी मिळून उचलायचे वृक्षधनुष्य आहे. जगातील सर्वात मोठी 51 लाखांची हरितसेना आपण निर्माण करू शकलो आहोत. आपले उद्दिष्ट 1 कोटीचे आहे, तेही आपण लवकरच साध्य करू. 1926 हॅलो फॉरेस्ट ही हेल्पलाइन कार्यरत केल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व माध्यमातून मन की बात के साथ आपल्याला वन की बात ही करायची आहे. पर्यावरणाने या आधीच धोक्याची सूचना दिली आहे ती समजून घेण्याची गरज आहे. फळझाड लागवडीतून, बांबू लागवडीतून शेतकर्यांना उत्पन्नाची पर्यायी साधने ही उपलब्ध करून देता येतील त्यादृष्टीने ही वृक्षलागवडीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे. स्वच्छ गावे -हरित गावे, स्वच्छ शहरे-हरित शहरे या संकल्पनेवरदेखील शासन काम करत आहे. रानमळाच्या धर्तीवर वृक्ष लागवडीचा नवा पायंडा राबवण्यात येत आहे, असे सांगून त्यांनी जीवनातील प्रत्येक प्रसंग वृक्षाच्या रूपाने चिरंतन करता येऊ शकेल, असे आवाहनही केले.
वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी केवळ शुभेच्छा नाही तर प्रत्यक्ष सहभाग घेऊन काम करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, वृक्ष लागवडीसारख्या विषयाला एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. पैसे मोजणारे अर्थमंत्री आपण खूप पाहिले, पण पैशाबरोबर झाडे लावून त्याची मोजणी करणारा अर्थमंत्री आपण सर्वजण पहिल्यांदाच पाहत आहोत. पाणी आणि मातीचे संवर्धन केले, तर अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात, हे लक्षात घेऊन मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीतून निरोगी जीवनाबरोबर रोजगाराशी सांगड घातली आहे.