मुंबई : कोरोनाच्या रुग्णात दररोज वाढ होताना दिसत आहे. सरकार आवश्यक त्या सर्व खबरदारी घेत आहे. मात्र मुंबईतील लोकल रेल्वेने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात, त्यामुळेही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो हे लक्षात घेऊन मुंबईतील लोकल रेल्वे ७ दिवसासाठी बंद ठेवल्यास लाखो लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्यात मदत होईल असे मत व्यक्त करत लोकल सेवा बंद ठेवण्याची मागणी भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी मुंबई बंद करण्याच्या पर्यायावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे.
नियोजनबद्धपणे मुंबई बंद केली त्याचा फायदा प्रादुर्भाव रोखण्यास होईल असेही मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
पंकजा मुंडे यांनी अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचीही मागणी केली होती. त्या म्हणाल्या होत्या, “अधिवेशन कालावधी कमी केला, सुट्ट्या देणं, घरुन काम हे निर्णय विचारात आहेत. ते योग्य आहेत. मी अशी मागणी सर्वप्रथम जाहीरपणे केली आणि आता मी अंमलबजावणी करणार आहे! मी माझं कार्यालय हे 2 एप्रिलपर्यंत बंद ठेवणार आणि दौरेही रद्द करत आहे. सहकार्य करावे आणि स्वतः या गोष्टी पाळाव्यात ही विनंती.”