प्रतिभा शिंदेच्या प्रश्नोत्तरानंतर अधिकार्यांना फुटला घाम
भुसावळ– वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी यास सातबारा मिळण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर लोकसंघर्ष मोर्चातर्फे बुधवारी सायंकाळी मोर्चा काढण्यात आला. रेल्वे इन्स्टिट्यूट, बसस्थानकापासून मोर्चाला सुरूवात झाली. लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी शेतकरी परीषद होवून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा आल्यानंतर मोर्चेकर्यांनी बाहेर ठिय्या मांडला तर प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. वनाधिकार कायद्या म्हणजे काय? अधिकार्यांना शिंदे यांनी विचारणा केल्यानंतर प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने अधिकारी चांगलेच घामाघूम झाले. सायंकाळी उशिरापर्यंत मोर्चेकरी प्रांत कार्यालयाबाहेर थांबून होते.
मोर्चेकर्यांच्या मागण्या अशा
सर्व वनजमीन धारकांना सात-बारा मिळावा, लोक व प्राणी सहजीवनाने राहतात त्यामुळे धोकाग्रस्त क्षेत्र घोषित करू नये, सामुदायीक वनाधिकार बहाल करण्यात यावे, 12 अ ची चौकशी जनपक्षीय व्हावी, वनपाडे महसूल करावेत, शेतीमालाला हमी भाव मिळावा, दीपनगर विस्थापिताना न्याय मिळावा, वनजमीन धारकांना पीककर्ज मिळावे, गायरान जमीन नावावर करावी, शेतकर्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
यांचा मोर्चात सहभाग
लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, चंद्रकांत चौधरी यांच्यासह श्याम फुलगावकर, सागर बहिरुणे, सचिन धांडे, अशोक तायडे, किरण मिस्त्री, सीमा पाटील, सतीश पाटील, गाढू बारेला, राजकुमार ठाकूर, पुरूषोत्तम पाटील, इरफान तडवी, शहादाब खान, विजय पाटील यांच्यासह परीसरातील नागरीक मोर्चात सहभागी झाले.