मुंबई : रिपब्लिकन पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत 2 ते 3 आणि विधानसभा निवडणुकीत 30 ते 35 जागा हव्या आहेत असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटल आहे. शिवाय यंदा पक्ष 50 टक्के जागा अनुसूचित जाती जमाती सोडून इतर प्रवर्गातील उमेदवारांना देणार आहे. असं देखील आठवले यांनी म्हटलं आहे. ‘शिवसेना स्वतंत्र लढल्यास दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होईल. मी, राहुल शेवाळे आणि एकनाथ गायकवाड अशी लढत होईल. मी विजयी होईन. पण भाजप सेना एकत्र लढल्यास माझ्यासाठी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ सोडावा अशी विनंती मुख्यमंत्री आणि शिवसेनेला करणार आहे. मुख्यमंत्री शिवसेनेची समजूत काढतील.’असं आठवले यांनी सांगितलं.
एमआयएम-भारिप युतीच्या बद्दल बोलताना आठवले म्हणाले की, या युतीचा फायदा भाजप आणि आरपीआयला होईल. मुख्यमंत्री पदापर्यंत पोचण्याइतपत ही आघाडी मोठी नाही. या आघाडीचे 2 – 3 आमदार तरी निवडून येतील का अशी मला शंका आहे. पण या आघाडीला काही मतं मिळतील. ज्याचा आम्हाला फायदा होईल.अनुसूचित जातीची मतं प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आहेत असं मानण्याचा काही भाग नाही. माझ्यामागे समाजाची मोठी ताकद आहे. ‘भारिप- एमआयएम युतीमागे भाजप नाही, पण या युतीमुळे भाजप नक्की पुढे जाणार आहे. असं देखील केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.