लोकांचे जीव घेणे म्हणजे गोरक्षा नव्हे – मोदी

0

साबरमती । देशात गोरक्षेच्या नावावर होत असणार्‍या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच मौन सोडून भाष्य केले. आज साबरमतीमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गोरक्षेच्या नावाखाली जी हिंसा होते त्याचे मला अतीव दु:ख होते आहे. गोरक्षेसाठी सगळ्यात मोठे योगदान विनोबा भावे आणि महात्मा गांधी या दोन नेत्यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान त्यांनी अहमदाबादमधल्या साबरमती आश्रमाचा दौराही केला. तसेच याठिकाणी येऊन त्यांनी चरख्यावर सूतही कातले. गायीची महती काय असते हे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लहानपणीचा किस्सा सांगितला, एका कुटुंबासमोर एक गाय रोज येऊन भाकरी-पोळी खात असे. एकेदिवशी ती गाय धावत येत होती. त्या कुटुंबातल्या मुलगा तिच्या पायाखाली आला आणि चिरडला गेला. त्यानंतर गायीने आठ ते दहा दिवस त्या कुटुंबासमोर येऊन अश्रू ढाळले अन्न आणि पाणी घेतले नाही, पश्चात्ताप म्हणून आपला प्राणत्याग केला. यावरूनच गाय किती महत्त्वाची असते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

लोक एवढे हिंसक का ?
गायीचे रक्षण करण्यासाठी लोक पुढे येतात आणि माणसांची हत्या करतात. हिंसाचार माजवतात, गोरक्षणाची ही कोणती पद्धत आहे? असाही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साबरमती येथील कार्यक्रमात विचारला. देशात गायीच्या नावाखाली हिंसाचार केला जातो, एखाद्या रूग्णालयात रूग्ण दगावला तर त्याचे संतापलेले नातेवाईक रूग्णालय जाळतात. ही सगळी परिस्थिती क्लेशदायक आहे. ज्या देशात मुंग्यांना अन्न देणे पुण्य समजले जाते, भटक्या कुत्र्यांना खायला घालणे ही इथली भूतदया आहे त्या देशाला काय झाले आहे? या देशातले लोक एवढे हिंसक का होत आहेत? असाही प्रश्न मोदी यांनी विचारला आहे. त्यांनी इतिहासाचाही दाखला दिला. गोरक्षा म्हणजे हिंसाचार माजवण्याचा एकाधिकार नाही. ही बाब अत्यंत गैर आहे, याचा निषेध करावा तितका थोडा आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात नमूद केले आहे.

हा तर शब्दांचा खेळ-ओवेसी
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षणावरून आपले मौन सोडल्यानंतर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदींनी फक्त शब्दांचा खेळ केला. ते जे बोलले तसे त्यांनी करुन दाखवावे. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये अंतर आहे अशी टीका ओवेसींनी ट्विटरवरुन केली आहे. मोदी या मुद्यावर दोनदा बोलले पण त्याचा काही परिणाम दिसून आला नाही. मागच्या वर्षी दादरीमध्ये घरात बीफ ठेवल्याच्या संशयावरुन मोहम्मद अखलाखची जमावाने हत्या केल्यानंतर मोदी या विषयावर बोलले होते. पण त्याचा काहीही परिणाम दिसला नाही. गो-रक्षकांना भाजपा आणि संघाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा मिळतो असे ट्विट ओवेसींनी केले आहे. पहलू खानची हत्या करणा-या तिघांना अजून का अटक झालेली नाही ? याचे कारण राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आहे असे ट्विट ओवेसींनी केले.