भोपाळ : राज्याच्या सचिवालयात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला ‘वंदे मातरम’ म्हणण्याची प्रथा बंद करण्याच्या निर्णयावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘वंदे मातरमला आमचा विरोध नाही. ही प्रथा काही काळापुरती स्थगित केली आहे. नव्या स्वरूपात ती पुन्हा सुरू करण्यात येईल,’ असं कमलनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.
मध्य प्रदेशमध्ये बाबूलाल गौर मुख्यमंत्री असताना १३ वर्षापूर्वी सचिवालयात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी ‘वंदे मातरम’ गावे असा निर्णय करण्यात आला होता. तेंव्हापासून ही प्रथा कायम होती. गेल्या महिन्यात सत्तेवर आलेल्या कमलनाथ यांनी ही प्रथा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळं एक जानेवारी रोजी सचिवालयात ‘वंदे मातरम्’ झाले नाही. या निर्णयावर भाजपने जोरदार टीका केली. ‘वंदे मातरम’मुळे विशिष्ट धर्मीयांच्या भावना दुखावतात म्हणून कमलनाथ यानी हा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केला. तर, विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वल्लभ भवनाच्या (सचिवालय) आवारात ‘वंदे मातरम’ म्हणणार आहोत,’ असं ट्विट चौहान यांनी केलं होतं.
भाजपने घेतलेल्या या भूमिकेनंतर कमलनाथ यांनी या मुद्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘वंदे मातरम् थांबवण्यामागे कोणताही अजेंडा नाही. वंदे मातरम् आमच्या हृदयात आहे. वेगळ्या स्वरूपात आम्ही ते पुन्हा सुरू करू. हे गीत पोलीस बँडच्या सुरावटीवर गाण्यात येईल व सर्वसामान्य जनतेलाही यात सहभागी करून घेतले जाईल, असा खुलासाही मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.