पुणे । वकिली पेशा हा उत्तम व हुशारीचा पेशा आहे. पूर्वी वकील म्हणजे हुशार व्यक्ती, न्यायालयात खटला चालविणारे असा अर्थ होत असे. परंतु आज त्याचा फायदा राजकारणात देखील होताना दिसतो. राज्यसभेत बोलताना माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या दोन व्यक्तींचे भाषण मला खूप आवडते. त्यांची मांडणी, बोलण्याचे कौशल्य उत्तम आहे. हे दोघेही अर्थमंत्री असले तरी त्यांनी वकिलीचा अभ्यास केला आहे. त्यामुळे वकिलीचा अभ्यास राजकारण्यांना सर्वार्थाने फायद्याचा आहे, असे मत खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.
बार असोसिएशनसह अनेक संस्थांकडून सन्मान
महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात ज्येष्ठ वकील अॅड. विनायक करकंडे यांंच्या पासष्टीपूर्ती सोहळ्यात त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा व त्यांच्या पत्नी भाग्यश्री करकंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शशिकांत सुतार, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. के. आर. शहा, नियती शहा, अनंत तरे, नगरसेविका अश्विनी कदम, डॉ.अशोक कामत, अॅड. राजेंद्र दौंडकर, दीपक माळी, अनिल पायगुडे, अजय पाटील, शिवाजी औटी, हर्षद निंबाळकर उपस्थित होते. याशिवाय पुणे बार असोसिएशन, लॉयर कन्झुमर सोसायटी, ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी, शिवाजी मराठा संस्था यांच्यावतीने देखील अॅड. विनायक करकंडे यांचा सन्मान करण्यात आला.
त्या संस्था पुन्हा एकत्रित…
शशिकांत सुतार म्हणाले, करकंडे हे पेशाने वकील असले तरी दोन वाद होणार्या संस्थांच्या बाजूने ते असायचे व त्या संस्था पुन्हा एकत्रित येऊन काम कशा करतील, यासाठी ते प्रयत्न करायचे.
मानसिकता घडविण्यासाठी
अॅड. करकंडे म्हणाले, पुण्यात 1970 साली जेव्हा आलो तेव्हा हातगाडी ओढण्याचे काम करीत होतो. तेव्हा अनेक व्यक्ती भेटल्या, त्यामुळे निरखून पारखून मैत्री करणे कधी जमलेच नाही. यापुढील 10 वर्षांत विद्यार्थ्यांची मानसिकता घडविण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय कमाविले हे महत्त्वाचे
अॅड. के. आर. शहा म्हणाले, माणूस जीवन जगताना ते कसे जगतो हे महत्त्वाचे नाही, तर त्याने आयुष्यात काय कमाविले आहे हे महत्त्वाचे आहे. करकंडे जेव्हा पुण्यात आले, तेव्हा हातात काही नसताना त्यांनी गरिबीतून विश्व उभे केले.