नवी दिल्ली : मुलांप्रमाणे मुलींचा देखील वडिलांच्या संपत्तीत हिस्सा देण्याची तरतूद कायद्यात आहे. दरम्यान आता वडिलांच्या मृत्यूनंतरही मुलींना संपत्तीत समान वाटा मिळणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हिंदू वारसा दुरुस्ती कायदा 2005 अस्तित्वात आहे. वडील हयात असले किंवा नसले तरीही संपत्तीमध्ये मुलांप्रमाणे मुलींना समान वाटा मिळणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असलेल्या सर्व मुलींना सुधारित कायद्याचे अधिकार लागू होतील. संबंधित मुलीचा जन्म कधी झाला, याने फरक पडणार नसल्याचेही कोर्टाने सांगितले आहे.
हिंदू वारसा कायद्याच्या कलम 6मध्ये 9 सप्टेंबर 2005 रोजी महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी दुरुस्ती केंद्र शासनाकडून करण्यात आली होती. वडिलोपार्जित संपत्तीत (स्थावर मालमत्तेतही) मुलांच्या बरोबरीने मुलींनाही जन्मत:च समान भागीदार म्हणून हक्क प्राप्त करून देण्याबाबतची ही दुरुस्ती आहे. परंतु कायदा दुरुस्ती अस्तित्वात आली, त्यापूर्वी म्हणजेच 2005च्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असेल, तर मुलींना याचा लाभ मिळेल की नाही, हे स्पष्ट नव्हते.