वरणगावात लॉक डाऊनच्या काळात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा

0

भुसावळ : लॉक डाऊनच्या काळात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वरणगाव शहरासह परीसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसा आणि रात्री-बेरात्री खंडित होणारा वीजपुरवठा त्वरीत सुरळीत करावा, अशा मागणीचे निवेदन शनिवार, 2 मे रोजी येथील महावितरणचे सहायक अभियंता अखिलेश कुशवाह यांना शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे देण्यात आले.

नागरीकांना नाहक मनस्ताप
निवेदनाचा आशय असा की, संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्गने हाहाःकार माजवला आहे. संसर्ग थांबवण्यासाठी राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे. या लॉक डाऊनमध्ये वरणगावसह परीसरात दिवसा रात्री-बेरात्री केव्हाही वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने नागरीकांना वीज खंडीत झाल्यावर घराबाहेर पडल्याशिवाय पर्याय नसतो. नागरीक घराबाहेर निघाल्यावर पोलिस दंडुके मारतात तसेच मुस्लिम समाज बांधवांचा रमजान महिना सुरू आहे. अशा वारंवार खंडित होणार्‍या वीज पुरवठ्यामुळे नागरीकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमुद केले आहे. निवेदनाचा विचार करून वीज पुरवठा सुरडीत करण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने राष्ट्रवादी आंदोलन करेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर राष्ट्रवादीचे नगरपालिका गटनेते नगरसेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक हरी मराठे, शहराध्यक्ष संतोष बळीराम माळी, नगरसेवक विष्णू नेमीचंद खोले, गणेश सुपडू चौधरी, रवींद्र शांताराम सोनवणे, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक पप्पू जकातदार, शेख फराज, शेख रीजवान, इद्रिस खान, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रकाश नारखेडे, राजेश पंडित चौधरी, ओबीसी तालुकाध्यक्ष गजानन वंजारी, शेख एहसान, पवन मराठे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.