मुंबई : बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील वरळी हा सर्वात मोठा प्रकल्प असल्याने या प्रकल्पाच्या निविदेकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने धारावीप्रमाणेच हा प्रकल्प रखडतो की काय अशी भीती होती. पण अखेर निविदेला प्रतिसाद मिळाल्याने हा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने तब्बल तीन वेळा म्हाडाने निविदेला मुदतवाढ दिली होती. अखेर तीनदा मुदतवाढ दिल्यानंतर निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून तीन बड्या कंपन्यांनी निविदेसाठी उत्सुकता दर्शवली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
पुर्नविकासाचा प्रश्न मार्गी लागणार
ना.म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळीतील बीडीडी चाळी यांचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार ना.म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील पुनर्विकासाचा नारळ याधीच फुटला आहे. तर येथील रहिवाशांच्या पात्रता निश्चितेसाठी बायोमेट्रीक सर्व्हेक्षणाच्या प्रक्रियेलाही म्हाडाकडून सुरुवात झाली आहे. वरळीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी एप्रिलमध्ये निविदा काढण्यात आल्या होत्या. पण या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल तीन वेळा निविदेला मुदतवाढ देण्यात आली. मुंबई मंडळाकडून मात्र तांत्रिक अडचणींमुळे आणि बिल्डरांना निविदा सादर करण्यासाठी वेळ हवा असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले जात होते.
तिसर्यांदा निविदेला दिली मुदतवाढ
तिसर्या मुदतवाढीनंतर तीन बड्या कंपन्या वरळी बीडीडीच्या पुनर्विकासासाठी पुढे आल्या आहेत. यात टाटा प्रोजेक्ट, एसीसी आणि आयएलएफएस या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. आता या कंपन्यांच्या निविदांची छाननी करत मग त्यांच्याकडून आर्थिक निविदा मागवण्यात येतील आणि मग त्यानंतर निविदा अंतिम करत कंत्राट बहाल करण्यात येणार आहे. वरळी बीडीडीच्या पुनर्विकासाला अखेर प्रतिसाद मिळाल्याने नायगाव आणि ना. म.जोशीपाठोपाठ आता वरळीच्या पुनर्विकासालाही लवकरच सुरुवात होईल.