वरूणराजाची कृपा राहिल्याने टंचाई आराखडा अवघा 14 लाखांचा

0

जिल्ह्यात यंदा केवळ 18 गावात संभाव्य पाणीटंचाई


जळगाव: जिल्ह्यावर यंदा वरूणराजाची कृपा राहील्याने दरवर्षी तयार करण्यात येणारा संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा अवघ्या 13 लाख 90 हजार रूपयांचा करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. पाऊस अतिउत्तम झाल्यानेच आराखडा प्रथमच एवढ्या कमी रकमेचा तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यात यंदा 138 टक्के पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी पार केली होती. त्यामुळे नद्या, तलाव, धरणे ओव्हरफ्लो झाले आहे. जानेवारी महिन्यात देखिल नद्या, तलावांना पाणीच पाणी आहे. त्यामुळे दरवर्षी तयार होणारा आराखडा तयार करण्यावरून प्रशासनात पेच निर्माण झाला होता. जिल्हा परीषदेच्या पाणी पुरवठा विभागाने यंदासाठी सुरवातीला 2 कोटी 38 लाखांचा आराखडा तयार केला होता. परंतु जिल्ह्यातील धरणे आणि नद्यांची पाणी परिस्थीती लक्षात घेता हा आराखडा जिल्हा परीषदेकडे पाठविण्यात आला होता. आज सुधारीत आराखडा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यात 18 योजना प्रस्तावित

नव्याने तयार करण्यात आलेल्या टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात यंदा अमळनेर तालुक्यातील 9 आणि पारोळा तालुक्यातील 9 अशा एकुण 18 गावांना संभाव्य पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यासाठी 18 योजना प्रस्तावित करण्यात आल्या असुन खर्च 13 लाख 90 हजार रूपये इतका प्रस्तावित आहे. यात प्रादेशिक नळ योजनांची विशेष दुरूस्ती केली जाणार आहे. गतवर्षी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा हा 36 कोटी रूपयांचा तयार करण्यात आला होता. यावेळेला मात्र जिल्ह्यात तब्बल 138 टक्के पाऊस झाल्याने आराखडा अवघा 13 लाख 90 हजार रूपयांचा करण्यात आला असल्याची माहिती प्रशासकीय
सुत्रांनी दिली.