वसुलीसाठी महावितरणचा इशारा

0

कोल्हापूर । वीज बिलांच्या वसुलीची मोहीम महावितरणने तीव्र केली आहे. यात अधिकारी, कर्मचार्‍यांना दरमहा वीज बिलांच्या वसुलीसाठी उद्दिष्ट दिले आहे. अशा बिलांची वसुली करण्यात हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणार्‍या राज्यातील 9 अधिकारी, कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले तर इतर 40 जणांना नोटिसा पाठविल्या आहेत. यातून महावितरणची वसुलीची तीव्रता वाढल्याचे दिसत आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर परिमंडलात गंभीर कारवाई झालेली नाही, तरीही 8 जणांना नोटीस निघाल्याचे सांगण्यात येते. महावितरणला रोखीने वीज खरेदी करावी लागते. त्यामुळे विजेच्या बिलांची वसुली काटेकोरपणे करून त्यातून जमलेल्या महसुलातून वीज खरेदी करण्यासाठी मदत होते. त्यामुळे वसुली गतीने झाली नाही तर महसुलाचे गणित बिघडते. वीजनिर्मिती किंवा खरेदी करणे जिकिरीचे बनते. त्यामुळे वीज बिलांच्या वसुलीला प्राधान्य द्यावे लागत आहे. त्यानुसार वीज ग्राहकांकडून ज्या त्या महिन्यांची वीज बिले ज्या त्या महिन्यातच शंभर टक्के वसूल करावीत यासाठी महावितरणच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना महावितरणच्या मुख्यालयाकडून आल्या आहेत. असे असूनही गेल्या महिन्यात अपेक्षित वसुली झालेली नाही.

… तर निलंबनाची कारवाई
वीजनिर्मिती, खरेदी- पुरवठा यांचे सूत्र बिघडण्याची वेळ आली तेव्हा महावितरणची कोंडी झाली. त्यामुळे थकबाकी वसुली करण्यावर महावितरणने पुन्हा जोर दिला. यात घरगुती, वाणिज्य, औद्योगिक अशा सर्व वीज ग्राहकांकडून थकबाकीची वसुली तातडीने करावी. ज्या थकबाकीदारांनी वारंवार सांगूनही वीज बिले भरलेली नाहीत, अशांचा वीजपुरवठा खंडित करावा, अशा सूचना महावितरण मुख्यालयाकडून आल्या आहेत. वसुली करण्यात जे अधिकारी व कर्मचारी कमी पडत आहेत त्यांना सुरवातीला नोटीस बजवली जात आहे. त्यानंतरही वसुली झाली नाही तर निलंबनाची कारवाई होत आहे.

कोल्हापुरात कारवाई नाही
मोबाइल ऍपद्वारे मीटर रीडिंग घेण्याची सोय आहे, तसेच फॉल्टी व सरासरी रीडिंग असलेल्या मीटरचे रीडिंग सुरू झाले आहे. तरीही वीज बिलांची वसुली करण्यात कोणी अधिकारी, कर्मचार्‍यांकडून हयगय झाल्यास त्याला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 9 अधिकारी, कर्मचारी निलंबित झाले. कोल्हापूर परिमंडलात अद्यापही अशी कारवाई झालेली नाही.

विविध उपाय योजना
दरम्यान थकीत विज बिलाचा आकडा वाढत असतानाच दुसरीकडे तो कसा कमी करायचा याचे आव्हान अधिकार्यांसमोर आहे. त्यासाठी विज कंपनीच्या अधिकार्यांनी विविध उपाय योजना सुरु केल्या आहेत. तसेच जिल्हयातील विज बिल वसुलीसाठी 40 सहायक अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली तीन- तीन कर्मचार्यांचे एक पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाकडून विज बिल वसूल करण्याची मोहिम राबवली जात आहे.