वादग्रस्त बोलणार्‍या वकिलाला हाकलले

0

दिल्ली उच्च न्यायालयातील घटना

नवी दिल्ली । ‘स्त्री हे नरकाचं प्रवेशद्वार’ असे वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या वकिलाला उच्च न्यायालयातून बाहेर हाकलण्यात आले. मुलींना आश्रामात डांबून ठेवून त्यांच्यावर लैगिंग आत्याचार केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या विरेंद्र देव दीक्षित यांचा बचाव करताना वकिलाने हे वादग्रस्त विधान केले. त्याच्या वक्तव्यानंतर मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी त्या वकिला खडेबोल सुनावत न्यायालयाच्या बाहेर जाण्याचे आदेश दिले.

सर्वजण झाले आश्चर्यचकित
’स्त्री हे नरकाचे प्रवेशद्वार असते, त्यामुळे आम्ही मुलींना आश्रमात कैद करुन ठेवतो.’ असे विधान त्याने केले होते. त्याचे हे वक्तव्य ऐकून न्यायमूर्तींसह न्यायालयात उपस्थित सर्वचजण आश्चर्यचकित झाले. नवी दिल्लीतील महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी वकिलाच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला. हे वक्तव्य आपत्तीजनक असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी त्याला न्यायालयाबाहेर हाकलून दिले.

आश्रमाने स्वतःला विद्यापीठ म्हणू नये
आम्ही कोणत्याच सोसायटीचा भाग नाही, किंवा आम्हावर कोणत्याही विद्यापीठाचा आदेश लागू होत नाही. कारण आम्ही कोणतीच डिग्री किंवा डिप्लोमाची पदवी देत नाही. असे विरेंद्र देव यांच्या वकिलाने न्यायालयाने सांगितले. यावर न्यायालयाने त्यांना प्रतिप्रश्न विचारला, तुम्ही आश्रमाला विद्यापीठ कसे म्हणता? त्यावर वकिल म्हणाले की, आश्रमाचा करताकरविता देव आहे. त्यामुळे आम्ही त्याला विद्यापीठ म्हणतो. वकिलाने विरेंद्र देव दीक्षित यांना देव म्हटले. ते म्हणाले की, देव स्वतः ज्ञान देत आहेत. तर त्याला कोण विद्यापीठ म्हणण्यास नकार देऊ शकतो. न्यायालयाने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, आश्रम विद्यापीठ या शब्दाचा वापर करु शकत नाही. कारण त्याची निर्मिती ही विद्यापीठाच्या नियमानुसार झालेली नाही. युजीसीची मान्यताही त्याला मिळालेली नाही. त्यामुळे आश्रमाने स्वतला विद्यापीठ म्हणू नये.