पुणे । गणपत महाराज जगताप यांच्या जीवनावर लिहिलेला हा ग्रंथ खर्या अर्थाने वारकरी संप्रदायाला भूषणास्पद ठरणार आहे. जगताप यांचे जीवन हाच खरा संदेश आहे. नेत्रहीन असूनसुद्धा त्यांनी ज्ञानेश्वरी, गाथा, भगवद्गीता मुखोद्गत केलेली आहे. त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ समाजाला योग्य दिशादर्शक ठरेलर, असे मत हभप डॉ. तुकाराम महाराज गरूड, ठाकुरबुवा दैठणेकर यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या वतीने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या 721 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहात कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून हभप श्री गणपत महाराज जगताप यांच्या जीवनावर उर्मिला विश्वनाथ कराड यांनी लिहिलेल्या दिव्यदृष्टीचा देदिप्यमान ज्ञानदीप या ग्रंथाचेे प्रकाशन डॉ. दैठणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, प्रज्ञाचक्षु हभप श्री गणपत महाराज जगताप, नानजीभाई ठक्कर ठाणावाला, हभप नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर, पं. उद्धवबापू आपेगावकर, सुनील गायकवाड, डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर हे उपस्थित होते.
केवळ माऊलीचा एक नम्र भक्त
जगताप म्हणाले, माझ्यावर चरित्र ग्रंथ लिहावा, एवढा मोठा मी नाही, देवाने माझे चर्मचक्षू काढून घेतले, पण मला प्रज्ञाचक्षू दिले. मी केवळ माऊलीचा एक नम्र भक्त आहे. माझ्यासारख्या लहान माणसाचे चरित्र आज सर्वांसमोर येत आहे. ही सर्वस्वी माऊलीचा आशीर्वाद आहे. डॉ.विश्वनाथ कराड म्हणाले, गणपत महाराज जगताप यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ ब्रेल लिपित लिहून या जगातील दृष्टीहीनांसाठी सर्वात मोठे कार्य आहे. त्यांनी आपल्या प्रवचनातून समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला आहे. गणपत महाराज यांना संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ असून त्याचे अनुकरण करण्यास वारकर्यांना सदैव प्रेरित करीत असतात.
परिस्थितीपुढे हार मानली नाही
उर्मिला कराड म्हणाल्या, गणपत महाराज यांच्या आचरणाकडे पाहून मी त्यांचे शिष्यपद स्वीकारले. त्यानंतर त्यांच्या जीवनाचा प्रवास ऐकून मी दंग झाले. लहानपणी देवीच्या साथीने वयाच्या आठव्या वर्षी अचानक दृष्टी गेल्यानंतरही त्यांनी परिस्थितीपुढे हार मानली नाही. आपल्या जीवनाचे शिल्पकार फक्त संत ज्ञानेश्वर आहेत हे लक्षता ठेऊन त्यांनी फक्त ऐकून संपूर्ण ज्ञानेश्वरी, गाथा, भगवद्गीता पाठ करून वारकर्यांना आपल्या प्रवचनातून सतत मार्गदर्शन करीत आहेत.